Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday 31 March 2020

सोडून दिलंय

एकवीस दिवसांच्या त्या बंदिस्त जीवनात नवरा बायकोला प्रश्न पडला
आतापर्यंत कोणी काय केलंय

बायको म्हणे नवऱ्याला
तुम्ही आजकाल माझ्याशी बोलायचं सोडून दिलंय
कामाच्या नादात हसायचं सोडून दिलंय
आता आहे संधी तर थोडं बोलूया
गप्पा गोष्टी करून थोडं हसुया

नवरा म्हणे बायकोला
बोलून मी काय बोलणार?
बोलायचं सोडलं म्हणून तर तुझे ऐकतोय
नुसतंच काय हसायचं म्हणून थोडं काम करतोय
कसली आलीय संधी यापेक्षा कामं बरी
प्रश्न पडतोय आता बसून काय करू घरी

वैतागलेली बायको करणार तरी काय?
नवऱ्याच्या थंड उत्तरावर बोलणार तरी काय?
पण शांत राहील ती बायको कसली
पटकन तिला युक्ती सुचली
तात्विक्तेच्या शब्द जाळ्यात ओढून नवऱ्याला बोले ती नारी...

बंदिवास हा थोडा आला तर नाराज झाली स्वारी
बंदिनी आम्ही आयुष्यभराच्या केल्या कधी का तक्रारी?
हसत नाहीत थोर म्हणून लेकरांनी का हसणे सोडून दिलंय
तोडतील कोणी वेलीच्या कुशीतून म्हणून कळ्यांनी का उमलायचं सोडून दिलंय
सुंदर आयुष्य देऊन देवाने आपल्याला मनुष्य केलंय
अन् वागताय असे जसं शंभर वर्षाचं कर्ज दिलंय

तात्विक्तेच्या शब्द जाळ्यात फसेल तो नवरा कसला
बायकोच्या त्या बोलांवर तो छद्मी वदला
बंदिनी तर तुम्हाला समाजाने केलंय अन्
बंदिवास आम्हा सरकारने दिलाय
थोरांच्या मायेने लेकरू ते हसते
अन् वेलीच्या कुशीतून तुटलेलं फुल देवाच्या माथी वसते
आयुष्य जसे दिसते तसे ते कधीच नसते

काय सांगू आणखी तुला
तुमच्यासाठीच तर माझा जीव तळमळतोय
जगायचं सोडून दिलंय म्हणून तर जगतोय...


                                                 - विशाल बळवंत बर्गे

Saturday 28 December 2019

न भूतो...निर्मिती प्रवास आणि आभार प्रदर्शन

न भूतो...निर्मिती प्रवास आणि आभार प्रदर्शन

व्यंगचित्र मालिका, प्रत्येकाच्या आवडीचा नसला तरी प्रत्येकाकडून एका हलक्या मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून पाहिला गेलेला विषय. तसा व्यंगचित्रे आणि माझा दूरवर ही काही संबंध नव्हता पण व्यंगचित्रांच्या माध्यमातून देण्यात येणारा कोणताही संदेश ज्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतो तसा तो शब्द सौंदर्याने काठोकाठ ओथंबलेल्या दीर्घ काव्य अथवा निबंधातून तो जन सामान्यांपर्यंत पोहचेल याची काही शाश्वती नाही आणि याची प्रचिती वेळोवेळी आपण घेत आलो आहोत.

व्यंगचित्रांची ताकद पारखण्यासाठी सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्व. बाळ ठाकरे यांचं मार्मिक च्या अंकातून तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर केलेलं टीकात्मक परंतु मनोरंजनात्मक शरसंधान जे लोकांच्या काळजाला भिडल, आज परिस्तिथी बदलली आहे लोकांचे प्रश्न बदलले आहेत आणि ओघाने मनोरंजनाची व्याख्याही, परंतु व्यंगचित्रे आजही जिवंत आहेत परिस्थितीनुरूप स्वतःला बदलत. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांची ' चिंटू ' ही दिर्घ व्यंगचित्र मालिका हे त्याचं जिवंत उदाहरण.

असो, व्यंगचित्रांचा महिमा सांगण्याचा उद्देश हाच की ही एक स्वतंत्र कला आहे ज्या मध्ये कलाकाराच्या शब्द चातूर्या बरोबरच चित्र कलेचा ही कसं लागतो.

प्रवास
' न भूतो ' या व्यंगचित्र मालिकेच्या निर्मितीचा आणि माझ्या या पहिल्या प्रयासाचा प्रवास ओघाने झाला म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. मला चित्र काढण्याची हौस आहे आणि त्यामुळे मी माझ्या कॉलेज च्या दिवसांमध्ये या कलेला पूरक अशा animation कोर्स ला एडमिशन घेतली होती (द्वी मितीय आणि त्रि मितिय ) परंतु तो एक अर्ध वेळ कोर्स होता आणि माझा व्यावसायिक किंवा पूर्ण वेळ मी कॉमर्स शाखेला दिला होता. काळ परत्वे मी दोन्ही बाजूंचे अभ्यासक्रम पूर्ण केले आणि अर्थार्जन म्हणून पूर्णवेळ अभ्यासक्रमास न्याय सुसंगत असं क्षेत्र निवडलं, परंतु मनातून कले प्रतीचा ओढा कायम होता. त्याच वेळी मला एका व्यावसायिक वेब साईट करता व्यंग चित्र मालिका तयार करण्याचा प्रस्ताव आला परंतु मी त्यावेळी स्वतः बद्दल साशंक होतो आणि मला कोणालाही बांधील राहून काम करण्यात रस नव्हता. म्हणून त्यावेळी मी तो प्रस्ताव नाकारला परंतु व्यंगचित्र मालिकेच्या निर्मितीचे बीज त्या क्षणी माझ्या मनात कायमचं पेरल गेलं. आणि हाच तो क्षण होता ज्यावेळी मी ठरवलं व्यंगचित्र मालिका निर्मितीबाबत.

बीज
या पूर्वी मराठी मध्ये ज्या काही व्यंगचित्र मालिका निर्मित झाल्या त्या निव्वळ मनोरंजन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन सामजिक परिस्थितीला संयुक्तिक आणि समांतर अशा होत्या. ज्यात तुमच्या आमच्या सारखी माणसे केंद्रबिंदू होती. मला ही चौकट मोडायची होती. मला असं जग निर्माण करायचं होत जे आपल्या समाजा सोबत सुसंगत तर असेल परंतु ते जग पूर्णतः वेगळं असेल आणि विचार करता मला आपल्या समाजा चा हिस्सा नसला तरी प्रत्येक आबाल वृद्धांच्या जिव्हाळ्याचा तरी अनाकलनीय गूढ आणि भीतीदायक प्रकारचा दुआ सापडला आणि तो म्हणजे ' भूत '

कथा निर्मिती
संकल्पना तर सुचली होती परंतु त्या संकल्पनेला सुसंगत कथाबिज निर्मिती आणि त्यानंतर पात्र निर्मिती हे खरे आव्हान होते. सुरुवात केली कथा निर्मितीपासून आणि सलग कथे ऐवजी छोट्या छोट्या भागातून विनोदी अंगाने परंतु कधी सामाजिक विषयाला हात घालत तर कधी उपहासात्मक तर कधी फक्त निव्वळ मनोरंजन हा हेतू समोर ठेऊन विविध भाग लिहीत गेलो आणि बघता बघता माझे ६० भाग लिहून झाले

पात्र निर्मिती
या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात अवघड भाग म्हणजे पात्र निर्मिती कारण याआधी भूत म्हणजे सरधोपट साचात झालेलं त्यांच प्रस्तुतीकरण आणि लोकांच्या मनात असलेली त्यांची पूर्व विकसित छबी जी परदेशस्थ कलाकारांनी निर्माण केली होती मला त्यातून बाहेर पडून पूर्णपणे वेगळी आणि भारतीय बनावटीची पात्र निर्मिती करायची होती. आपल्या लोक कथांमधून प्रसिद्ध असलेली चरित्र या व्यंगचित्र मालिकेसाठी निर्माण करण्याचे मी ठरवले आणि दंतकथा व मंदिरे आणि गाव वेशीवरील प्रतीकात्मक चिन्हे या गोष्टीतून प्रेरणा घेऊन त्यांची निर्मिती केली परंतु त्यांचे भीतीदायक रूप पालटून त्यांचे व्यंगाच्या  दृष्टिकोनातून चित्रीकरण केले आणि काही चारित्रांना मानवी पेहराव ही दिले

सजावट आणि सहयोग
लेखन आणि पात्र निर्मिती झाल्यावर लोकांसमोर त्यांचे योग्य प्रस्तुतीकरन होणे ही तेव्हढेच आवश्यक होते आणि त्यासाठी मला निव्वळ शब्दाखातर सहयोग केला माझा भाचा आणि तरुण सजावटकार आकाश देशमुख याने त्याचे आभार मानणे कदाचित संयुक्तिक ठरणार नाही कारण तो या छोट्या प्रवासात माझा सहकारी होता. त्यासाठी त्याला एक छोटं वाक्य ' Thank You '

आभार
मी ' न भूतो ' ही व्यंगचित्र मालिका सोशल मीडियावर प्रस्तुत करण्यापूर्वी काहीसा साशंक होतो कारण त्या आधी ही मालिका वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावी म्हणून मी प्रयत्नशील होतो, परंतु त्यात यश लाभले नाही आणि ' मन का हो तो अच्छा ओर ना हो तो ओर भी अच्छा ' या उक्ती प्रमाणे दुसऱ्या आणि सहज लोकप्रवण अशा माध्यमाचा म्हणजे सोशल मिडीयाचा वापर करण्याचं मी ठरवलं.
तत्पूर्वी मी चिंटू कार चारुहास पंडित यांची भेट घेतली आणि त्यांनी ही मला त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन माझ्या संकल्पनेला समर्थन देत ' न भूतो ' च्या प्रसिद्धीस प्रोत्साहित केले. तसेच मराठी जगतातील महान आणि दैवी देणगी लाभलेले व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना भेटण्याचा योग ही याच काळात आला आणि त्यांनी मला ' न भूतो ' च्या हस्तलिखित प्रतीवर स्वाक्षरी देऊन शुभाशीर्वाद दिले. या दोन महनिय व्यक्तींचे आभार मानावे तेवढे कमीच मी त्यांचा शतश: आभारी आहे

रसिक वाचकांसाठी..
कोणत्याही कलेच यश त्याच्या रसिकांच्या पाठिंब्याशिवाय अशक्य असतं , इथे समर्थनार्थ आकडा महत्वाचा नसतो तर जे काही रसिक लाभले असतील त्यांच प्रेम आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य महत्वाचं असते. मी ' न भूतो ' या व्यंगचित्र मालिकेच्या सर्व रसिकांचे मन: पूर्वक आभार मानतो आणि आपले प्रेम असेच कायम राहो अशी प्रार्थना करतो.

धन्यवाद

                                               - विशाल बळवंत बर्गे
                                                 (संकल्पना आणि चित्रकार - ' न भूतो ')

संकेतस्थळ -  http://vbargedp.blogspot.in/


Sunday 4 March 2018

मादीचा जन्म

प्रस्तावना -: माणूस कोणाची आठवण केव्हा काढतो? एक तर जेव्हा ती व्यक्ती जिवंत नसते किंवा ती त्याच्या जवळ नसते.मला एक प्रश्न नेहमी पडतो,जागतिक पुरुष दिन कधीच नसतो पण जगात त्यांच वर्चस्व पदोपदी जाणवतं. कदाचित त्यामुळेच पुरुषांना कोणताही एक दिवस साजरा करण्याची गरज भासत नसावी.पण याउलट महिलांची स्तिथी दिसते.इतरवेळी महिलांना जी वागणुक मिळते त्याचा आढावा घेतला तर महिला दिन साजरा का करतात हे समजते, कारण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचं अस्तित्वच समाजाने आठवणी पुरतं मर्यादित ठेवलं आहे जे मुळात नाहीच.स्त्री आणि पुरुष समानता तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण त्यांच्यात भेद करणं बंद करू.आज ही जी कविता मी प्रस्तुत करतोय ती नाममात्र कल्पना आहे पण तिचा गाभा हा स्त्री-पुरुष एकतेतच आहे.

                         मादीचा जन्म

अपूर्वकाळी देवाने नर ची निर्मिले होते, दोहो नरातील एक नर प्रिय समंजस होता,सहिष्णुतेचा महिमा तयाचा अपरंपार होता
दुसरा नर शीघ्र कोपी अन चंचल मानी होता,सहोदराच्या सहिष्णुतेचा याने अनर्थ केला अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
देवानेही प्रथम नराच्या गुणाला परखून रत्न तया दिधले,परी तयाने अट सांगता पशु-पक्षीही थिजले
"हे बालका आहे हे असामान्य रत्न, करील जे तुझ्या गुणांचे उत्तरोत्तर वर्धन,परी जर तू हे रत्न व्यर्थ गमावशील,पशु-पक्ष्यांसाहित सर्व समजतील तुला पुरुषार्थहीन"
एव्हढे बोलून देव अंतर्धान पावला,अन द्वितीय नराचा मत्सर-द्वेष जागा झाला, अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
द्वितीय नराने मग मोहाने रत्न गमन ठरविले,सहोदराला बंधुत्वाच्या शृंखलेत अडकविले,घेऊन ते मग रत्न बंधुत्वाचा अव्हेर केला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
प्रथम नराला पुरुषार्थहिनतेचा टिळा बसला,पण वर बसलेला विधाता खुदकन गाली हसला,प्रथम नराने देवाला मग आर्तवे केली
"क्षमा करावी पिता झाल्या अपराधासी,बंधुत्वाच्या शृंखलेत मी अडकूनी गेला होतो,भावनेच्या भरात वाहून गेलो होतो,बंधूने जरी अपहरिले रत्न ते मौल्यवान तत्काळ करावा त्या रत्नाच्या गुणांचा अपहार
एव्हढे बोलता देव प्रगट तयापुढे झाला,
"व्यर्थ रुदन नको बालका असे हे विधीलिखित,रत्न गुणाच्या अपहाराचा अधिकार नाही मजला,परी तुझ्या गुणांचा मोह मला झाला, यापरी आता मी तुला नवा जन्म देतो,रत्नाहून ही सुंदर मोहक शरीर तुला देतो,जाता सहोदराकडे तो शरण येईल तुजला रत्न तुला देऊन तो दास बनेल तुझा"
एव्हढे बोलता देव अंतर्धान पावला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
पाहता स्व शरीराकडे तो (ती) क्षणभर मोहित झाला,अपूर्व सौन्दर्याने तो स्वतः ची विचलित झाला. देवाचे आभार मानूनी तो सहोदराकडे गेला, वर्तवले जसे देवाने आस तसा फिरला,दोघांच्या संयोगाने नवा जीव जन्मला,अन याच मदाच्या पायी मादीचा जन्म झाला
नवरत्नाने मग दोन नरांच्या गुणांचा विस्तार केला,प्रथम नर आता मादी म्हणूनच ठेला,या मादीच्या वंशवेली मग चहूदिशा फिरल्या, रत्नापरी शरीराने स्व-गुण प्रसवत्या झाल्या,अन याच मदाच्या पायी....

                                    - विशाल बळवंत बर्गे

Saturday 13 January 2018

गोड गोड बोला

दुधात चॉकलेट मिसळा आणि दुधाची शक्ती वाढवा! वा काय जाहिरात आहे, जसं काही दूधचं अशक्त आहे.म्हटलं लोकं आजकाल किती पटकन विश्वास ठेवतात अशा जाहिरातींवर.जाऊ द्या मुलं दूध पितील म्हणून आई बाप सुद्धा विश्वास नसला तरी ते प्रोडक्ट घेतात.
आता हाच न्याय जर आपण आपल्या जिभेसाठी वापरला तर?म्हणजे जिभेवर नेहमी चॉकलेट ठेवायची स्वप्नं पाहू नका नाहीतर कॉलेस्ट्रोल वाढायचं.चेष्टेचा भाग सोडला तर जिभेत जशी मुळातच ताकत आहे त्यात आपण जर साखरेचा गोडवा आणला तर किती बरं होईल नाही.छोट्या छोटया गोष्टींसाठी भांडून आपण वर्षातून कितीतरी वेळा तोंड कडू करत असतो आणि निष्पत्ती काय? तर नात्यातही तोच कडवटपणा जो ईच्छा नसतानाही गिळावा लागतो.तसं कोणी जाणून बुजून कोणाशी वैर धरत नाही ही गोष्ट जरी मान्य केली तरी काही काळापुरता अबोला ठीक पण आयुष्यभरासाठी ही भीष्म प्रतिज्ञा घ्यायची तरी कशाला? (पेलवत नसताना) आणि स्वतःला च त्रास करून घ्यायचा.त्यापेक्षा स्वतः च आपलं मन हलक करून समोरच्याशी गोड बोललं तर काय वाईट.भले समोरचा काही बोलला नाही तरी तो गोडवा त्याच्या नाहीतरी तुमच्या हृदयात उतरेलचं की नाही.
मग आज 14 जानेवारी 2018 पासून आपण संकल्प करूया जिभेत गोडवा आणण्याचा कदाचित थोडं अवघड वाटेल पण प्रयत्न तरी करा मग बघा जिभे बरोबरच नात्यांची ताकद कशी वाढते ते!

मकर संक्रातीच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा...तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला😊

                                           - विशाल बळवंत बर्गे

Saturday 6 January 2018

दंगल घडण्यामागची तात्विक मीमांसा

वैश्विकदृष्ट्या पाहायला गेलं तर माणूस हा एक प्राणी आहे. माणूस इतर प्राण्यांपासून यासाठी वेगळा आहे कारण त्याला बुद्धी आहे पण माणूस आणि प्राण्यांमध्ये एक समान दुवा आहे तो म्हणजे भावना.
माणूस वैयक्तिक स्तरावर वैचारिक अथवा बुद्धिशील असतो परंतु संयुक्तरित्या तो भावनाशील उरतो.याचं कारण बहुदा इतरांच्या विचारांशी आपले विचार तो अवलोकन करतो परंतु इतरांचे विचार आपल्या विचारांना धक्का देणारे ठरू लागले तर त्याच्या दोन प्रतिक्रिया निर्माण होतात.एक तर तो इतरांचे विचार धिक्कारतो कारण त्याचा अहंम दुखावतो
दुसरी गोष्ट म्हणजे तो दुसऱ्यांचे विचार स्वीकारून त्यात त्यांना सामील होतो, कारण त्याची स्वतःची विचारांची अस्पष्टता आणि बौद्धिकदृष्ट्या इतरांचे विचार आपल्या विचाराहून योग्य वाटणे.
आता हे मुद्दे विस्ताराने सांगायचे तर, एक असं अवलोकन आहे की बहुतकरून मोठमोठ्या सभांमध्ये होणाऱ्या वक्तव्यांमध्ये समविचारी किंवा समधर्मी समाज एकत्र होतो, त्यांना एकतर वक्त्याच्या विषयामध्ये रुची असते किंवा त्याचे विचार जाणून घेण्यास ते उत्सुक असतात, तर दुसऱ्या प्रकारचे लोक असे असतात जे आधीपासून वक्त्याच्या विषयवस्तुस परिचित असतात आणि त्याचे समर्थन करणारे सुद्धा.
आता उपरोक्त समुदायात लोकांचा रोख वक्त्याच्या 'बुद्धिवादाकडे' (तो त्याच्याकडे असो अथवा नसो) केंद्रित झाल्याने त्यांची वैयक्तिक बुद्धी ही वक्त्याला शरण जाते आणि भावनेला मोकळी जागा मिळते आणि तिथे तिचे बुद्धीशी द्वंद्व होत नाही. एकदा का लोकांची भावना जागृत झाली की वक्त्याचे काम फक्त त्यांच्या भावनेशी खेळण्याचे उरते (तसा वक्त्याचा हेतू असो अथवा नसो) म्हणून बहुतकरून मोठ्मोठ्या सभांमध्ये होणाऱ्या भडकावू भाषणानंतर समाज चेततो किंवा दंगलीस प्रवृत्त होतो. भारतात विशेषकरून उत्सव आणि सभांमध्ये नियंत्रण ठेवावे लागते, कारण अशा ठिकाणी बुद्धी शरण जाते परंतु भावना चंचल असतात त्यामुळे त्या शरण जात नाहीत.बुद्धी जेव्हा शरण जाते तेव्हा श्रद्धा निर्माण होते जी कोणत्याही सिद्धांत,मत,विचार किंवा धर्माबद्दल असू शकते.श्रद्धेतून निर्माण होते धारणा, धारणेतून निर्माण होतात विचार आणि विचारातून निर्माण होते कृती. म्हणून कोणताही नवीन विषय किंवा विचार जाणून घेण्याआधी धारणा किंवा पूर्वग्रहांना तिलांजली देणं आवश्यक आहे.

                                          - विशाल बळवंत बर्गे

Saturday 30 December 2017

तो एक सेकंद....

मागे काही दिवसांपूर्वी सहज म्हणून मामा मामी कडे गेलो. बरेच दिवस त्यांच्याकडे जाणं झालं नव्हतं, म्हणून आवर्जून त्यांच्याकडे गेलो.नेहमीप्रमाणे चहा पाण्याचे सोपस्कार पार पडल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरुवात झाली.
मामी सांगत होत्या, गणपतीच्या वेळी त्यांचा मुलगा कसा डेंगीने आजारी पडला आणि तो बरा होतोय तोवर त्याही आजारी पडल्या आणि त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येत कसा परिणाम झाला ते. विषयाचा ओघ आजकाल कुणाला काय होईल आणि काय नाही याचा नेम नाही असाच होता.सगळं काही अशाश्वत. माणूस आज आहे तर उद्या नाही असे सांगत मामानी काही किस्सेही सांगितले.विषयाचा ओघ पाहून मी ही मामांच्या म्हणण्याला दुजोरा देत पुस्ती जोडली की , जगात दर सेकंदाला दोन व्यक्ती मरतात आणि त्याच सेकंदात चारजण जन्माला ही येतात.या काहीशा सकारात्मक आणि सत्य परिस्थितीवर एकमत होऊन तो विषय आम्ही तिथे संपवला.
आज जेव्हा मी कधी तो संवाद आठवून घडयाळाकडे पाहतो तेव्हा मी काहीसा अंतर्मुख होतो.घड्याळातील ते दोन मोठे काटे प्रत्येक आकड्यावर विसावा घेत जात असताना एक बारीकसा सेकंद काटा मात्र कुठल्याही आकड्याशी बांधील न राहता सरसर पुढे सरकत असतो.दुनिया जरी मिनिट आणि तासांच्या परिभाषेत जगत असली तरी तो सेकंद काटा जाणीव करून देतो की त्यांचं मोजमाप त्याच्या शिवाय करणं अशक्य आहे.तो सेकंद काटा जाणीव करून देतो जगातील अशाश्वत गोष्टींची ज्या आज आहेत त्या उद्या नक्कीच नसणार,न जाणो आपल्या कळत नकळत जगात त्या प्रत्येक सेकंदाला किती लोक अनंतात विलीन होत असतील आणि किती जन्माला येत असतील.त्यात आपलाही एखादा सेकंद येईल त्या मृत्यू पावणाऱ्या दोन आकड्यात भर घालायला.
म्हणूनच कदाचित सेकंद काटा कुठल्याही आकड्याशी बांधील नसावा तो आपला सरकत असतो कुठेही विसावा न घेता. तो एक जसा अनाहूत सल्लाच आहे आपल्यासाठी की कुठल्याही व्यक्ती आणि परिस्थितीत बांधील न राहता पुढे जाण्याचा.जे आज आहे ते उद्या नसणार हे जर सत्य आहे तर आजच्या दुःखासाठी रडत का बसा आणि आज जे सुख वाटतंय त्याचा माज तरी का करावा.आपण फक्त पुढे जावं जीवनाच्या प्रत्येक क्षणात समरस होऊन.विशिष्ट गोष्टींची वाट पाहून उत्सव साजरा करण्यापेक्षा जीवनच उत्सव केला तर काय वाईट.
शेवटी आपलाही एक सेकंद येणार आहे आणखी चार जनातील एकाला जागा करून द्यायला.

(प्रिय वाचक, नवीन वर्षाच्या तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा.प्रत्येक क्षण नवीन आहे फक्त त्याचं आवर्तन पूर्ण झाल्यावर आपण ते नूतन वर्ष म्हणून साजरं करतो.साजरं फक्त नवीन वर्ष करू नका प्रत्येक क्षण साजरा करा.)

                      ।।शुभम भवतु।।

                                   - विशाल बळवंत बर्गे

Sunday 24 December 2017

स्वार्थ

'तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे आणि परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे हित पाहणे'
रमेश त्याच्या आवडत्या वर्ग शिक्षकाचे म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता.
'हा! तर स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित पाहणे व परमार्थ म्हणजे दुसऱ्याचे!' सरांचे वाक्य रमेशच्या मनात रुंजी घालत होते.कुमारवयीन रमेश आजपर्यंत घेतलेल्या अनुभवांचा वरील वाक्याशी ताळेबंद करु पहात हॊता.
बसल्या जागी त्याच्या मनात एक विचार आला
'स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टी एव्हढ्या साध्या का आहेत?स्वार्थी विचार आल्याशिवाय माणूस पुढे कसा जाईल? आणि परमार्थ करायचा म्हणजे दुसऱ्यांच्या हिताचा विचार प्रथम करायला हवा , बाप रे!'
रमेशचं मन द्विधा अवस्थेत होतं,एव्हढ्यात त्याला आईची हाक ऐकू आली.
'रमेश, ऐ रमेश, एव्हढं एक काम करतो का रे?'
'काय?' रमेश जरा वैतागूणच म्हणाला
'दुकानातून जरा किराणाचं सामान आणशील का?'
'हे काय? जरा कुठे निवांत बसलो की काम! वैताग नुसता' त्याच्या मनात विचार आला.
तो आईला रागातच म्हणाला
'मी नाही जाणार'
आता आईने आपला आज्ञाधारी सूर थोडा मवाळ केला तिला चांगल्या प्रकारे माहित होतं  की रमेश कडून हे काम कसं करून घ्यायचं ते,
'असं काय करतोस रे बाळा! जा ना, हवं तर उरलेले पैसे तुलाच ठेव!'
आईचं हे वाक्य कानी येताच रमेश खुश झाला जसं काही तो याचं गोष्टीची वाट पहात होता.तो लगेच दुकानात जायला तयार झाला.
दुकानात जात असताना त्याच्या मनाने मघाशी सार्थ चिंतनपर तुटलेला दुवा लगेच सांधला. त्याच्या मनात पुन्हा स्वार्थ आणि परमार्थाचे विचार येऊ लागले.
'अरे मी एव्हढा स्वार्थ आणि परमार्थाचा विचार करतोय खरा पण आईचं एक छोटंसं करण्यासाठी मी उरलेले पैसे स्वतःकडे ठेवण्याची लाच स्वीकारली, म्हणजे माझी ही कृती सुद्धा स्वार्थीच नाही का?'
रमेशला त्याच्या या कृतीचं वाईट वाटलं.
दुसऱ्या दिवशी रमेश त्याचा मित्र विनू कडे गेला,नाहीतरी सुट्टीत घरी बसून त्याला कंटाळाच यायचा.विनूकडे गेल्यावर त्याच्याकडे कॉम्प्युटर गेम्स खेळून त्याचा तेवढाच विरंगुळा व्हायचा.
बाहेर दिवाणखान्यात विनूचे वडील कोणाशीतरी बोलत हॊते, म्हणून विनू त्याला आतल्या खोलीत घेऊन गेला.बाहेरच्या खोलीतून आवाज येत होता,
'एव्हढं आमच्या नव्या फॅक्टरीसाठी कर्ज मंजूर करून द्या'
'ठीक आहे मी सांगितलेली कागदपत्रे तयार आहेत ना?'
'हो'
'मग ती मला द्या'
'या वेळी तरी होईल ना काम?आता जवळ जवळ एक महिना होत आला.'
'अहो मला मान्य आहे, पण बँकेतून कर्ज मंजूर करून घेणं एव्हढं का सोपं आहे'
'बरं प्रयत्न तरी करा'
'हो तर, तुम्ही काळजी करू नका.आणि हो जरा वरचे पैसे लागतील.'
'ठीक आहे,देईन'
'बरं मग येतो मी'
एजंट होता वाटतं, कर्ज मंजुरीसाठी केव्हढा हा खटाटोप आणि पैशांची काय भानगड?त्याचा मनात विचार येऊन गेले.
विनूकडून घरी आल्यावर त्याने सहज म्हणून पेपर चाळायला घेतला. एका पानावर ठळक अक्षरात बातमी होती,
पत्रकार जुडीथ मिलर ला अटक
पूर्ण बातमी वाचल्यावर समजलं की या पत्रकार महिलेने विद्यमान अध्यक्षांच्या विरुद्ध बातमी देणाऱ्या एका व्यक्तीचे नाव उघड करण्यास नकार दिला त्यामुळे तिला अमेरिकी न्यायालयाने अटक केली होती.
'अरे ही तर हुकूमशाही आहे, हे बरोबर नाही.आणि हा तर चक्क सरकारी स्वार्थ!'
विनूच्या मनात पुन्हा विचारांच काहूर माजलं
इथून तिथून कुठेही जा स्वार्थ सगळीकडेच आहे, तो त्याचा असो वा माझा,छोटा असो वा मोठा...
आणि हो आता मी या स्वार्थाख्यानाचा शेवट माझे नाव लिहून मी माझा स्वार्थ पूर्ण करतो.

                                     - विशाल बळवंत बर्गे